मुंबई: महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मध्ये (Ladki Bahin Yojana) मोठी घोटाळा उघडकीस आला आहे. जुलै २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान, सरकारने सुमारे २.५ कोटी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांचे सात हप्ते दिले. मात्र, आता या योजनेतील सर्व महिलांचे अर्ज तपासण्यात येत आहेत आणि आत्तापर्यंत ३० लाख महिलांची नावे यादीतून वगळली गेली आहेत. या महिलांनी अपात्र असतानाही या योजनेचा लाभ घेतला, असे उघडकीस आले आहे.
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण योजना’ (Mazi Ladki Bahin Yojana) या योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना आर्थिक सहाय्य मिळते. परंतु, काही अपात्र लाभार्थी महिलांनी या योजनेचा अयोग्यपणे लाभ घेतल्याचे समोर आले आहे. आता त्या महिलांना आठव्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये या योजनेंतर्गत फसवणुक झाल्याचे उघड होत आहे. विशेषतः लातूर जिल्ह्यात २५ हजारांहून अधिक लाभार्थी महिलांचे अर्ज नाकारण्यात आले. सरकारने आता या योजनेची फेरपडताळणी सुरू केली असून, त्यात काही महिलांनी स्वतःहून, मी अपात्र असल्याने मला इथून पुढचा लाभ नको असे अर्ज केले आहेत. महिलांच्या पात्रतेच्या तपासणीला आता गती देण्यात आली आहे.
महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी सांगितले की, योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी सरसकट केली जाणार नाही. तसेच, महिलांना योजनेतून त्यांची नावे कमी करण्याचा पर्याय दिला जात आहे. त्यामुळे, योजनेची पारदर्शकता आणि न्यायिकता सुनिश्चित करण्यासाठी सरकारकडून आवश्यक पावले उचलली जात आहेत. ८व्या हप्त्याचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे. अस अदिती तटकरे म्हणाल्या.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेच्या अर्जदारांची कडक छाननी, फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई.